काँग्रेसने हीन वागणूक दिल्यामुळेच भाजपात प्रवेश: खासदार राजेंद्र गावित
मी राज्यमंत्री असताना केलेल्या कामाची पावती मतदारांनी मला निवडून देऊन दिली आहे. आदिवासींसाठी केलेल्या कार्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास होता. त्यामुळेच भाजपाचा विजय झाला. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास पालघरचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी दिला. काँग्रेसने मला अत्यंत हीन वागणूक दिली. मनाला लागेल अशा पद्धतीने वागवले. त्यामुळेच मी काँग्रेसचा त्याग करून भाजपात आल्याचा खुलासा गावित यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात आदिवासी मंत्री म्हणून गावित यांनी काम पाहिले होते. पक्षात प्रामणिकपणे काम करूनही आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने काँग्रेसचा त्याग केल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पालघरचा विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले. पालघरमध्ये सागरी आणि डोंगरी असे भाग आहेत. तेथील समस्याही वेगवेगळया आहेत. बेरोजगारी, आदिवासी, आग्री, कुणबी लोकांच्या समस्या आहेत. नऊ महिन्यांचा कमी वेळ असला तरी मागील अनुभवाचा उपयोग करून जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले. इव्हीएमएमधील बिघाडाशी भाजपाचा काही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.