खासदार अमोल कोल्हेंची आदित्य ठाकरेंवर टीका
‘विधानसभेपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर काढायला हवी होती. निमित्ताने कामे काय करायची हे समजले असते. मधल्या काळात यात्रा काढली असती तर कामाचे मुल्यांकन करता आले असते’. अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेवर टीकास्त्र सोडलं.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर ही यात्रा काढली आहे. त्याऐवजी त्यांनी सत्तेत आल्यानंतर ही यात्रा काढली असती तर त्यांना काम कसं करावं हे समजलं असतं. मध्यंतरी काढली असती तर कामांचं मूल्यांकन करता आलं असतं, असा टोला त्यांनी लगावला.