कृषी मालाला चांगल्या भावासाठी १० हजार गावांत स्मार्ट प्रकल्प
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट कंपन्यांना किंवा बाजारात विकता यावीत यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेला स्टेट ऑफ महाराष्ट्राज अॅग्रीबिझनेस अॅंड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून १० हजार गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने जागतिक बॅंकेच्या सहकार्याने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा आरंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरकार विविध कंपन्या, शेतकरी उत्पादक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. वॉलमार्ट, अॅमेझॉन, महिंद्रा, पेप्सिको, टाटा रॅलिज, बिग बास्केट, पतंजली आदी नामवंत कंपन्यांचा सहभाग आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख, पदुम मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश अय्यर आदी उपस्थित होते.
प्राथमिक टप्प्यात राज्यातील १० हजार गावांमध्ये स्मार्ट प्रकल्प राबविला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव-बाजारपेठ मिळवून देणे, या माध्यमातून कृषी तसेच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने स्मार्ट प्रकल्प निर्णायक ठरेल, असे फडणवीस म्हणाले.