‘मी टू’मुळे नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल: शिवसेना आमदार

‘मी टू’ मोहीम ही सुशिक्षित महिलांसाठी एक हत्यार ठरत असून या मोहीमेमुळे महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल, असे सांगत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ‘मी टू’ मोहीमेवर टीका केली. एखादी महिला पाच वर्षानंतर तक्रार करेल या भीतीनेच महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मंगळवारी राज्य महिला आयोग आणि समाजसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयक कायदे यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेना आमदार संजय शिरसाट सहभागी झाले होते. ‘मी टू’ मोहीमेबाबत आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘मी टू’ चा अर्थ मला कळालेला नसून मलाच ‘मी टू’ची भीती वाटते. स्वतः ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या महिलांसाठी ते एक हत्यार ठरु लागले आहे.
ग्रामीण भागातही महिलांचे शोषण होते. मात्र त्यांना ‘मी टू’ बद्दल माहिती नसते. अशा मोहीमांमुळे सक्षमीकरण होत नाही. याऊलट महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल, असे शिरसाट यांनी सांगितले. मुलांना सांभाळणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आणि संसाराचा गाडा सुरळीत ठेवणे ही महिलांची जबाबदारी आहे. पण आता कोणती महिला काय आरोप करु शकेल याचा अंदाज बांधता येत नाही. साडी दिली नाही म्हणून विवाहित महिला पतीविरोधातही ‘मी टू’ म्हणणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

More videos

See All