जळगावमध्ये महाजन-खडसे गटबाजीची सर्वत्र बाधा

पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हय़ातील निवडणुकांमध्ये भाजप एकामागून एक विजय संपादन करीत आहे. मात्र दुसरीकडे भाजपमध्ये गटबाजी, सोईचे राजकारण आणि बंडखोरीची यादवी वाढत चालली आहे. हा वाद आता खडसे-महाजन पुरता मर्यादित नसून जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सदस्यांनाही त्याची बाधा झाली आहे. भाजपचे हे सोईचे राजकारण आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
‘पार्टी विथ डिफरन्स’ असे म्हणवून घेणाऱ्या भाजपने जळगाव जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र काठावर बहुमत मिळवल्याने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. काँग्रेसला एक सभापती पद देत अध्यक्ष, उपाध्यक्षासह सर्व सभापतिपदासह स्थायी समिती आणि अन्य महत्वाच्या समित्यांमध्ये भाजपचेच सदस्य आहेत. जिल्हा परिषदेचे नेतृत्व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. परंतु सत्ता स्थापनेपासून सुरू असलेला गृहकलह थांबविण्यात महाजन पूर्णपणे अपयशी ठरत आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील या महाजन गटाच्या तर उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन हे खडसे गटाचे म्हणून ओळखले जातात. अन्य काही सदस्यांमध्ये गटतट पडले आहेत. यामुळे सत्ताधारी सदस्यच अध्यक्षांच्या विरोधात भूमिका घेतात. आता अध्यक्ष-उपाध्यक्षांमधील वाद विकोपाला पोहचला आहे. यात सभापती पोपट भोळे यांनी स्वत:चे स्वतंत्र संस्थान सुरू केले असून ते अध्यक्षांच्या कामात ढवळाढवळ करीत असल्याची नेहमी ओरड होते. या वादामुळे बैठकांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणे, बैठका रद्द करणे, जाहीरपणे विरोधी भूमिका घेण्याचे प्रकार दिवसागणिक वाढत आहे. या सत्ताधाऱ्यांमध्ये तिसरा गट उदयास आला असून योजनांची कामे स्वत:च्या गटात नेण्यासाठी त्यांची रस्सीखेच सुरु असते. पक्षातील वादाचे राजकारण करत तो कायम राहील याची दक्षता घेताना दिसतात.

More videos

See All