सुभाष देसाईंचे पंख छाटले; एकनाथ शिंदेंकडे कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

शिवसेनेनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर विभागप्रमुखांपाठोपाठ आता संपर्क नेतेही बदलले जात आहेत. कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी कोकणतल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती. मात्र आता त्यांचे पक्ष छाटण्यात आल्याची चर्चा शिवसेनेत आहे.

सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदेकडे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पूर्वी संपूर्ण कोकणची जबाबदारी असणाऱ्या सुभाष देसाईंकडे आता फक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी असेल. यापुढेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून अनेक महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. शिवसेना नेतृत्वाकडून मुंबईतल्या विभागप्रमुखांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. सुभाष देसाई, रामदास कदम आणि सुनिल प्रभू यांच्या तक्रारींनंतर कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना विभागप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे. अडसूळ विभाग दोनचे विभागप्रमुख होते. यामध्ये कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हा परिसर येतो. अडसूळ यांना हटवून त्यांच्या जागी सुधाकर सुर्वे यांना संधी देण्यात आली आहे. 

More videos

See All