मागासवर्गीय आयोगाचा अहवाल एका महिन्यांत येणार : मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्गीय आयोग सर्व बाबी तपासून पाहत आहे. महिनाभरात आयोगाचा आहवाल येणार आहे. त्यानंतर आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासून त्याबाबत सभागृहात चर्चा होईल. त्यामुळे सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मराठी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसह नारायण राणेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र, चर्चेसाठी उपस्थित असलेल्या मराठा समाजातील प्रतिनिधींची नावे कळू शकली नाहीत.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही अशी व्यवस्था केल्यानंतरच मेगा भरती केली जाईल. त्यामुळे त्यांनी या भरतीबाबत काळजी करु नये. त्याचबरोबर मराठा आंदोलनादरम्यान, तरुणांवर दाखल करण्यात आलेले ३०७ सह सर्व प्रकारच्या केसेस मागे घेण्यात येतील. मात्र, ज्यांनी पोलिसांवर हल्ले आणि जाळपोळींसारखे प्रकार केले आहेत, ते स्पष्टपणे व्हिडीओंमध्ये दिसत आहेत त्यांच्यावरील गु्न्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचबरोबर आंदोलनात काही संशयीत लोक घुसल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत यातील घुसखोरांबाबतची पडताळणी करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काकासाहेब नामक तरुणानाचा झालेला मृत्यू दुर्देवी असून तरुणांनी अशा गोष्टी करु नयेत, समन्वयकांनी याची जबाबदारी घेऊन राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

More videos

See All