रिक्षा-टॅक्सीत टोल फ्री नंबर लावणे अनिवार्य - परिवहनमंत्री दिवाकर रावते

 रिक्षा आणि टॅक्सीवाले यांच्या मुजोरीबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक हा टॅक्सी आणि रिक्षामध्ये लावणे अनिवार्य करण्यात येणार असून या टोल फ्री नंबरची जास्तीत जास्त जाहिरात करण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली. मुंबईच्या रस्त्यावर दिवसेंदिवस रिक्षा-टॅक्सी चालकांची मुजोरी वाढत आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त असून परिवहन विभागाने यावर लक्ष घालावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद ठाकूर यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सादर केली होती. 
परिवहन विभागातर्फे रिक्षा-टॅक्सी चालकांची तक्रार करण्यासाठी 1800220110 हा टोल फ्री क्रमांक  वाहनात लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच 62426666 या हेल्पलाईन क्रमांकाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीवर चालणार्‍या रिक्षांना परवानगी याआधीच दिली होती. आता त्याच प्रमाणे ओला-उबेर कंपनीच्या गाड्यांनाही सिटी टॅक्सीच्या दर्जा देऊन सीएनजी वापरण्यासाठी सक्तीचे करणार असल्याचेही रावते यांनी सांगितले. प्रदूषण कमी करण्यासंबंधीचे विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला होता. तसेच कालबाह्य झालेल्या रिक्षा-टॅक्सी कायमच्या बंद करण्यासंबंधी कार्यवाही सुरू असल्याचे रावते यांनी सांगितले. 
एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत १४,७८८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४३२८ वाहन दोषी आढळले आहेत. त्यापैकी १२९४ चालक परवाने निलंबित केले असून १०२४ वाहनांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच दोषी चालकांकडून ६८.७२ लाख तडजोड शुल्क व १५.६२ लाखांचा न्यायालयीन दंड वसूल केला असल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली. 
राज्याच्या ग्रामीण भागात पांढर्‍या नंबरवर चालणार्‍या ४ लाख बेकायदेशीर रिक्षा व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर अचानक बंदी आणली तर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच मार्च २०१८ पर्यंत काही शुल्क भरून त्यांना अधिकृत केले जाईल. मार्च नंतर मात्र शुल्क न भरणाऱ्या रिक्षांना बेकायदेशीर ठरवले जाईल, अशी माहितीही रावते यांनी दिली. 

More videos

See All